लोकसत्ता मधील लेख
विचार करून डोके शिणल्यावर कुटुंबाच्या काळजीसाठी विरंगुळा म्हणून थोडे बाहेर पडले, जास्तीची खरेदी केली तर या थोडय़ा जास्तीला लगेच ‘साठेबाजी’ म्हणावे?
मध्यमवर्गाचे कूळ व मूळ काय, असले फिजूल प्रश्न विचारण्याची ही वेळ नाही. सर्व जाती, धर्माचा समावेश असलेला हा वर्ग तसा राष्ट्रभक्त आहेच. थाळी वाजवणे, दिवे घालवणे व लावणे असल्या राष्ट्रकार्यात त्याचा सहभाग असतोच. हे काय राष्ट्रकार्य आहे का, असा प्रश्न कुणी उपस्थित केलाच तर त्याला तावातावाने उत्तर देण्यातसुद्धा हा वर्ग समोर असतो. त्यामुळे त्याच्या भक्तीविषयी शंका घेणे तसे चूकच. या वर्गाचे आणखी एक वैशिष्टय़ आहे. तो सदैव नियमांचे पालन करतो, इतरांना नियमांचे पालन करायला लावतो. जे करत नाहीत त्यांच्यामुळे अस्वस्थ होतो. तर अशा या वर्गाकडून एखादवेळ चूक घडलीच तर त्याचा किती बाऊ करायचा. याला काही धरबंद आहे की नाही! सध्याच्या टाळेबंदीच्या काळात मोठय़ा प्रमाणावर कापडी पिशव्या घेऊन बाजारात भाजी खरेदी करण्यासाठी जाणारा वर्ग हाच आहे असा जावईशोध कुणीतरी लावला व नाहक या वर्गास बदनाम व्हावे लागले. हा वर्ग सध्याच्या संकटाच्या काळात एवढय़ा भाज्यांची बेगमी कशासाठी करतो? तिकडे गरिबांना अन्न मिळत नसताना स्वत:ला संवेदनशील समजणाऱ्या या वर्गाने एवढी घाऊक खरेदी करण्याची गरज काय? यांच्या घरातल्या भाज्या रोजच्या रोज संपतात तरी कशा? दर आठवडय़ाला खाद्यतेलाचे पिंप घेऊन हा वर्ग घरात नेमके काय तळतो? यासारखे अनेक प्रश्न उपस्थित करून काही कुंठित मनांनी या वर्गास बेजार करून सोडले आहे. मुळात हे असे हल्ले करणाऱ्या जमाती अनेक गोष्टींतील कार्यकारणभाव समजून घेत नाहीत. यामागचे नेमके इंगित काय तेही लक्षात घेत नाहीत.
No comments:
Post a Comment