सामाजिक असमता, अंधश्रद्धा, भोंदूगिरीविरोधात साडेसातशे वर्षापूर्वी वारकरी संतांनी पहिली आरोळी पंढरपूरच्या वाळवंटात ठोकली. नामदेव, ज्ञानदेव ते वारकरी सांप्रदायाचे कळस म्हणून ओळखल्या गेलेल्या तुकाराम महाराजांनी अंधश्रद्धेविरोधात जोरदार जागरण केले. देवाच्या, धर्माच्या नावाने, कर्मकांडाच्या निमित्ताने समाजाचे शोषण करणा-यांच्या विरोधात वारकरी संतांनी अक्षश: कोरडे ओढले आहेत. त्यांनी केलेल्या समाजमनाच्या मशागतीमुळेच महाराष्ट्रात सुधारणावादी विचारांची पेरणी झाली.
महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचा भक्कम वारसा असून तो अधिक मजबूत करण्यात वारकरी संतांचे योगदान मोठे आहे. किंबहुना ज्यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धेच्या दलदलीत रुतून बसला होता, त्याच काळात वारकरी चवळवळीने अधिक आक्रमक होत त्याच्याविरोधात जागरण केले. सामाजिक समता आणि अंधश्रद्धामुक्त समाज हेच वारकरी सांप्रदायाचे मूळ उद्दिष्ट आहे. अंधश्रद्धेच्या आधीन गेलेल्या समाजाला जागृत करण्यासाठी ज्ञानोबापासून तुकोबापर्यंत आणि जनाबाईपासून बहिनाबाईपर्यंत सर्वानीच प्रयत्न केले.
ज्ञानेश्वर, नामदेव यांची भाषा काही सौम्य असली तरी तुकोबा मात्र अत्यंत परखड आणि थेट भाषेत समाजातील भोंदुगिरीवर कोरडे ओढतात. आपण देवाचा अवतार आहोत किंवा साधू आहोत. दैवी शक्ती आपल्याला प्राप्त झालेली आहे, असे सांगत स्त्रियांचे शोषण करणा-या आसाराम बापूंसारख्या ढोंग्यावर तुकाराम महाराजांनी किती कठोर शब्दात प्रहार केले, हे वारकरी म्हणून घेणा-या प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात-
अंगा लावूनिया राख।
डोळे झाकूनी करिता पाप।
दावोनी वैराग्याची कळा।
विषय भोगिती सोहळा।
आणि शेवटी तुकाराम महाराज म्हणतात-
तुका म्हणजे ऐशा नरा।
मोजोनी मारावे पैंजरा॥
जातीभेद आणि कर्मकांडाच्या अंधारात चाचपडणा-या समाजाला जागृत करण्यासाठी वारकरी संतांनी केलेले प्रयत्न फार मोलाचे आहेत. नामदेव, ज्ञानदेव ते तुकाराम महाराजांपर्यंत प्रत्येक संतांनी समाजातली अंधश्रद्धा आणि वर्णव्यवस्थेवर कोरडे ओढल्याचे दिसून केले. अंधश्रद्धा निर्मूलनाबरोबरच सामाजिक समता निर्माण करण्यासाठी वारकरी संतांनी केलेले प्रयत्न फार मोलाचे आहेत. किंबहुना वर्णव्यवस्थेचे चटके बसलेल्या सुधारणावादी विचारवंतांनीच पुढे येऊन ही चळवळ सुरू केली असे म्हणावे लागेल.
अर्थात, त्यावेळच्या व्यवस्थेच्या विरोधात बंडाचे निशाण फडकवीत असतानाही त्यांच्या भाषेत आक्रोष नव्हता, तर विनयशीलता होती. हजारो वर्षाच्या जातीभेदाच्या भिंती धडाधड पाडून टाकीत असताना त्यांनी कुठे क्रांतीची भाषा केली नाही.
सामाजिक विषमतेच्या आजारावर उपचार करीत असताना त्यांनी वरून मलमपट्टी केली नाही. अंतरंगात शिरून बदलाची प्रक्रिया सुरू केली. पोटात घेतलेले औषध जसे शरीरावरची जखम बरी करते, तसाच वारकरी संतांच्या विचाराने समाज आतून बदलत गेला आणि समाजातील उच्च-नीचतेच्या भिंती ढासळत गेल्या. पंढरीची वारी त्या विचाराचे विराट रूप आहे.
परकीय आक्रमकांनी भारतावर जवळपास कब्जा मिळविलेला होता, त्याच वेळी स्थानिक सर्व समाज मात्र कर्मकांडात अडकला होता. जातीभेद आणि उच्च-नीचतेच्या भोव-यात अडकलेला होता. उच्चवर्णीयांची अरेरावी आणि आक्रमकांची दादागिरी यात समाज भरडला जात होता. तेव्हा समाजाला कर्मकांडाच्या कचाटयातून सोडवत असतानाच जातीभेदांना गाढून सर्वाना एका व्यासपीठावर आणण्याचे काम संत नामदेवांनी केले. परिसा भागतांसारख्या ब्राह्मणापासून ते समाजातल्या शेवटच्या पायरीवर उभ्या असलेल्या चोखोबांपर्यंत सर्वाना एका व्यासपीठावर आणण्याचे काम त्यांनी केले. त्यासाठी त्यांना घणघोर संघर्ष करावा लागला असेल. त्याच्या पाऊलखुणा वारकरी संतांच्या अभंग रचनेत पाहायला मिळतात.
सामाजिक विषमतेचे चटके नामदेवांनाही मोठया प्रमाणात बसले असल्याचे त्यांच्या काही रचनांमधून दिसून येते. शिंप्याच्या कुळात जन्म घातल्यामुळे आपल्याला सामाजिक विषमतेचे चटके सोसावे लागतात ही तक्रार थेट देवाकडेच करताना नामदेव म्हणतात-
हिनदिन जात मोरी पंढरीचे के राया।
ऐसा नामा दर्जी तुने काहेको बनाया॥
त्यांच्या या रचनेवरूनच जातीव्यवस्थेच्या आगीत ते चांगलेच होरपळलेले दिसून येतात. ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताई या भावंडांनाही समाजात बहिष्कृत केल्याने प्रचंड मनस्ताप सोसावा लागला होता. म्हणूनच ज्ञानेश्वर आणि नामदेव या दोघांनी पुढाकार घेत त्यावेळच्या समाजातील सर्व स्थरातील विचार करणा-या लोकांना एकत्र करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यातूनच वारकरी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली गेली असे म्हणावे लागेल. त्यापूर्वी वारकरी नव्हते असे नाही. त्यापूर्वी वारकरीही होते आणि पंढरीची वारीही होती. मात्र नामदेव-ज्ञानदेव यांनी त्याचे चळवळीत रूपांतर केले.
सामाजिक विषमतेची दरी दूर करण्यासाठी प्रयत्न केले. त्यावेळच्या सर्व समाज घटकातील जे जाणते लोक होते त्यांना केवळ एकत्र आणले नाही, तर त्यांना व्यक्त होण्यासाठी लिहिते केले. त्याची सुरुवात त्यांनी आपापल्या घरातूनच केली. त्यासाठी नामदेवांनी अभंग हा काव्य प्रकार शोधून काढला. ज्ञानेश्वरांची सर्व भावंडे लिहिणारे-वाचणारे होते.
नामदेवाच्या भेटीपूर्वीच ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ दीपिका अर्थात, ज्ञानेश्वरी लिहिली होती. मात्र या दोघांची भेट झाल्यानंतर ज्ञानदेवांनी लोकांना कळेल अशा सोप्या भाषेत अभंग रचना सुरू केली. नामदेवांच्या घरातील लोक शिक्षित असतील असे गृहीत धरले तरी जनाबाईला मात्र खास लिहिते केले असावे असे वाटते.
नामदेवांच्या घरामध्ये एकूण चौदा सदस्य असल्याचा उल्लेख जनाबाईच्या अभंगातून पाहायला मिळतो. त्या सर्वाच्या नावाने काही अभंग आहेत. त्यांच्या घरात दासीचे काम करणा-या जनाबाईचे अभंग तर नामदेवांपेक्षाही अधिक बंडाची भाषा करतात.
याच काळात सामाजिक विषमतेचे चटके सोसलेले सावता माळी, सेना न्हावी, नरहरी सोनार, चोखामेळा हे सर्व जण एकत्र आले आणि त्यांनी आपल्या रचनेतून सामाजिक समतेची आरोळी देत असतानाच अंधश्रद्धा आणि कर्मकांडाविरोधात बंडाचे निशाण फडकविले. या संतांच्या बहुतेक रचनांमधून आपल्याला विषमतेचे चटके सोसलेले दिसतात. त्यातून त्यांची भाषा अधिक बंडखोर झाल्याची दिसते.
जनाबाई तर केवळ जातीव्यवस्थेतील असमानतेवर बोलत नाही, तर स्त्री म्हणून मिळत असलेल्या दुय्यम वागणुकीबद्दलही नाराजी व्यक्त करते. तेवढे करून ती थांबत नाही, तर इतर स्त्रियांना प्रोत्साहन देताना स्त्रीचा देह मिळाला म्हणून उदास होऊ नका, असा आशावाद जागविताना म्हणते-
स्त्री जन्म म्हणोनी न व्हावे उदास।
साधू संता ऐसे केले जनी॥
चोखाबांच्या पत्नी सोयराबाई यांची भाषाही खूप आक्रमक वाटते. वर्णव्यवस्थेच्या आगीत भाजलेली सोयराबाई थेट देवाला सवाल करते-
आमुची केली हिन जाती।
तूज न कळे श्रीपती।
जन्म गेला उष्टे खाता।
लाज नाही तुझ्या चित्ता।
सामाजिक विषमतेबरोबरच कर्मकांड आणि समाजातील अंधश्रद्धांवरही वारकरी संतांनी जोरदार कोरडे ओढल्याचे दिसून येते. क्रियाकर्मासारखी थेरं करून कोण तरुण गेले आहे, असा सवाल करताना नामदेव महाराज म्हणतात-
थेर क्रियाकर्म। करिता हो केली।
माजी कोण बळी। तरले सांगा?
क्रियाकर्मात अडकण्यापेक्षा वारकरी संतांनी कर्तव्याला अधिक महत्त्व दिल्याचे दिसते. म्हणूनच सावता महाराज आपल्या मळयात, भाजीतच विठोबाला पाहताना म्हणता-
कांदा मुळा भाजी।
अवघी विठाबाई माझी।
लसून मिरची कोंथिबीरी।
अवघा झाला माझा हरी।
सर्वच वारकरी संतांनी समाजातील ढोंगावर, भोंदूगिरीवर प्रहार केले असले तरी तुकाराम महाराजांची भाषा अधिक आक्रमक असल्याचे दिसून येते. शेंदूर लावून देवपण दिलेल्यांच्या नादी लागून स्वत:चीच चेष्टा करून घेणा-या भोळया-भाबडया लोकांना सावध करताना तुकाराम महाराज म्हणतात-
शेंदरी हेंदरी दैवते।
कोण ती पूजिता भूते केते।
आपुल्या पोटाशी रडते।
मागते शीते अवधान।
महाराज सांगतात अरे जे स्वत: उपाशी आहेत आणि तुमच्याकडे शिते मागतात ते तुम्हाला काय देणार आहेत. त्यामुळे अशांच्या नादी लागू नका. नवस सायास तर अजिबात करू नका, असे सांगताना महाराज अधिक स्पष्ट शब्दात सांगतात-
नवसे कन्या पुत्र होती।
तरी का करणे लागे पती।
भगवे कपडे घालू, कीर्तन करून, पुराण सांगून कुणी साधू होत नाही, असे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात-
नव्हती ते संत करिता कीर्तन।
सांगता पुराण नव्हती संत।
साधूची व्याख्या त्यांच्याइतकी अचूक फारच क्वचित कुणी केली असेल. महाराज म्हणतात-
जे का रंजले गांजले।
त्याशी म्हणे जो आपुले।
तोचि साधू ओळखावा।
देव तेथेची जाणावा।
अशा भक्कम विचारांतून महाराष्ट्रात सुधारणांचे वारे वाहिले.वारकरी संतांनी केलेल्या वैचारिक मशागतीमुळेच महाराष्ट्रात सामाजिक समता, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री सक्षमीकरणाची चळवळ उभी राहील. हे कार्य अविरत सुरू आहे.
No comments:
Post a Comment